नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चेन्नई सुपर किंग्सचा उपकर्णधार सुरेश रैनानं शनिवारी अचानक दुबई सोडून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. रैनाच्या या निर्णयानं सर्वांना धक्काच बसला. वैयक्तिक कारणास्तव रैनानं ही माघार घेतली असून तो यंदाच्या इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) खेळणार नसल्याचे के.एस. विश्वनाथन यांनी सांगितले. या कठीण काळात सीएसके त्याच्या व कुटुंबीयांच्या पाठिशी ठामपणे उभे असल्याचेही ते म्हणाले. पण, रैनानं नेमकी का माघार घेतली हे स्पष्ट होत नव्हते.
रैनाच्या काकांचे पठाणकोट येथील थरीयाल गावात झालेल्या हल्ल्यात निधन झाले असून आत्याची प्रकृती चिंताजनक आहे, त्यामुळे रैना मायदेशात परतला. रैनाचे नातेवाईक घराच्या टेरेसवर झोपले असताना मध्यरात्री त्यांच्यावर अज्ञात इसमांनी प्राणघातक शस्त्रांनी हल्ला केला. रैनाच्या वडीलांची बहिण आशा देवी यांची प्रकृती चिंताजनक आहे. दुसरीकडे त्याचे ५८ वर्षीय काका अशोक कुमार यांचे निधन झाले. रैनाचे आतेभाऊ कौशल कुमार (३२ वर्ष) आणि अपीन कुमार (२४ वर्ष) यांनाही दुखापत झाली आहे.
(PRAHAAR)