राज्यात सर्वदूर पुढचे तीन दिवस दमदार पावसाचा अंदाज आहे. या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. घाट माथ्यावरही जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान जळगाव जिल्ह्यातल्या तापी नदीवरच्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्यानं उघडलेल्या ३१ दरवाजांपैकी १९ दरवाजे बंद करण्यात आले आहेत. राज्याच्या विविध भागात पावसानं दमदार हजेरी लावली आहे.
पुढचे ३ दिवसही काही जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १५ तुकड्या तैनात करण्यात आल्या असल्याचं मंत्रालयातल्या नियंत्रण कक्षानं कळवलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीकरता ९ जुलै पर्यंत बंद करण्यात आला असून, येथील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे आहे.
कराड-चिपळूण मार्गावरील कुंभार्ली घाटात दरड कोसळली असून एकेरी वाहतूक सुरु आहे. दरड आणि पूर प्रवण भागातील १३६ कुटुंब म्हणजे ४७७ व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातले लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेन भरून वाहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर धरण परिसरातल्या नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन सिंधुदुर्ग पाटबंधारे विभागानं केलं आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या धोक्याच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या संपर्क सचिव वल्सा नायर सिंह यांनी काल सर्व विभागांची आढावा बैठक घेतली. सिंधुदुर्गात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचं एक पथकही दाखल झालं आहे. रायगड जिल्ह्यात काल पावसाचा जोर काहीसा कमी होता. मात्र त्याआधी झालेल्या पावसाने जिल्ह्यातील अंबा, पाताळगंगा, उल्हास, गाढी, सावित्री, कुंडलिका या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. कुंडलिका आणि पाताळगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने काल काहीशी उघडीप घेतली. त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी स्थिरावली आहे. धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरु असल्यामुळे राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भंडारदरा, घाटघर, रतनवाडी पांजरे, वाकी या भागात जोरदार पाऊस पडत आहे. याच तालुक्यातील मुळा नदीवरील पिंपळगांव खांड तलाव पुर्ण क्षमतेने भरल्यामुळे भरून वाहू लागला आहे. मात्र याच तालुक्यातील अकोले शहरासह पूर्व भाग अजूनही पावसाच्या प्रतिक्षेत आहे. मराठवाड्यात पाऊसमान काहीसं कमी असून विदर्भात मात्र जोरदार ते मुसळधार पाऊस सुरू आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी उपविभागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडल्याने भामरागड नजीकच्या लोकबिरादरी प्रकल्पाजवळील कुमरगुडा नाल्यावरील रपटा वाहून गेल्यामुळे आलापल्ली-भामरागड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. भंडारा जिल्ह्यात चांगला पाऊस पडत असल्यामुळे शेतीच्या कामाला वेग आला आहे. जिल्ह्यात वैनगंगा, आबू, चूलबंद नदीच्या जलसाठ्यात वाढ झाली असून गोसीखुर्द धरणाचे ५ दरवाजे उघडण्यात आले आहेत. (AIR NEWS)