पावसाचा जोर वाढला असल्यानं, पूर परिस्थिती निर्माण होऊन जीवित आणि मालमत्तेची हानी होऊ नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोकणातल्या सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून, एन डी आर एफ जवानांना, तसंच इतर पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग तसंच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नागरिकांना पावसामुळे वाढत्या पाण्याची आणि पूर परिस्थितीची वेळीच सूचना द्यावी, तसंच पूरग्रस्त भागातून स्थलांतर करावं लागल्यालं तर योग्य ठिकाणी त्यांची व्यवस्था करावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुंबईतील परिस्थितीवरही मुख्यमंत्री लक्ष ठेऊन आहेत. जोरदार पावसामुळे काही नद्यांनी इशारा पातळी गाठली असून, खबरदारी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडली असून अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास आणि गाढी या नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा थोडी कमी आहे. जगबुडी, काजळी नदीचं पाणी इशारा पातळीवरून वाहत असल्यानं या भागातील नागरिकांना वेळीच सूचना देणं, प्रसंगी त्यांना हलवणं, तसंच जीवितहानी होऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी तसंच जलसंपदा विभागाना सावध राहून योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. वाढता पाऊस आणि पुराची शक्यता पाहता मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याशी चर्चा केली असून, सबंधित पालक सचिवांना त्या त्या जिल्ह्यांमध्ये पोहचून प्रत्यक्ष देखरेख आणि नियंत्रण करण्याचे निर्देश दिले आहेत. (IMPUT FROM AIR )