कोविडचा धोका अद्याप टळलेला नसून सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व नागरिकांना केलं आहे. जागतिक पातळीवर सध्या दिवसाला सरासरी ९४ हजार कोविड रुग्ण आढळून येत आहेत.
भारतात मात्र एका दिवसात ९६६ रुग्ण आढळत आहेत. भारतामध्ये आठ राज्यांत कोविड रुग्णांचं वाढतं प्रमाण दिसून येत आहे. सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळत असून त्यानंतर गुजरात, केरळ, कर्नाटक राज्यांमध्ये कोविड रुग्णांचं वाढतं प्रमाण आढळून येत आहे. कोविड रुग्ण सापडण्याचं प्रमाण एक टक्के इतकं आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सर्व राज्यांना कोविड चाचण्यांचं प्रमाण वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्या देशभरात आढळून येणाऱ्या कोविड १९ चे व्हेरियंट हे ओमायक्रोनचे असल्याचं आढळून आलं आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली आहे. (AIR NEWS)