नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनानं जगभरात धुमाकूळ घातला असून, रुग्णसंख्याही दिवसागणिक वाढतच चालली आहे. कोरोनाला थोपवण्यासाठी केंद्रासह राज्य सरकारही प्रयत्नशील आहे. लॉकडाऊनमुळे रेल्वे सेवाही खंडित करण्यात आली आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या सध्या फक्त परराज्यांतील मजुरांसाठी किंवा काही विशेष प्रयोजनासाठी चालवल्या जात आहेत. पण लवकरच ही रेल्वेसेवा पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी रेल्वेनं शून्य आधारित वेळापत्रकाची एक नवीन योजना तयार केली आहे. सर्वच प्रवासी गाड्या आणि त्यांच्या फे-यांसाठी रेल्वे हे वेळापत्रक बनवत आहे.
रेल्वेने आपल्या सर्व मेल, एक्स्प्रेस व इतर काही गाड्यांचे थांबे (गंतव्यस्थानावर पोहोचण्यापूर्वी मध्ये येणारे स्टॉप किंवा स्थानके) कमी करण्याची योजना आखली आहे, जेणेकरून गंतव्यस्थानावर पोहोचण्यासाठी रेल्वेगाड्यांचा प्रवास वेळ कमी होईल. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी सांगितले की, कोरोना विषाणूमुळे या निर्णयाच्या अंमलबजावणीस उशीर झाला, परंतु त्याची अंमलबजावणी आता होणार आहे.
काही एक्सप्रेस आणि मेल गाड्यांच्या थांब्याबाबत निर्णय घेण्यात येईल. तत्पूर्वी अधिका-यांकडून किती प्रवासी चढले आणि नियोजित स्थानकांमधून किती लोक खाली उतरले याचा आढावा घेतला जाणार आहे. एका आठवड्यातून दोनदा धावणा-या गाड्यांना काही ठराविक स्टेशनांवर थांबा देण्यात येणार आहे. राजकीय विचारविनिमयानंतरच रेल्वेचे थांबे कमी करण्यास मान्यता मिळाली आहे. जर गाड्या त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचण्यापूर्वी हे थांबे कमी झाल्यास रेल्वे प्रवासाचा कालावधी कमी होईल आणि त्यानंतर ते लांब पल्ल्यासाठी नॉन-स्टॉप रेल्वे चालवण्यास सक्षम होतील.