मुंबई (प्रतिनिधी) : आशिया खंडातील मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी परिसरात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली आहे. मात्र एकीकडे धारावीतील यशस्वी उपचार पद्धतीने आदर्श निर्माण केला असताना जी उत्तर विभागाच्या अखत्यारीतील दादर, माहिममध्ये रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. कोरोनाच्या सर्वाधिक चारशे मृत्यूचे प्रमाणही जी उत्तर विभागात असल्याचे उजेडात आले आहे.
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वप्रथम वरळी कोळीवाडा येथे झाला. त्यानंतर धारावीतील झोपडपट्टीमध्ये झपाट्याने रुग्णांची संख्या वाढत गेली. दाटीवाटीच्या झोपडपट्टीत सोशल डिस्टन्सिंग शक्य नसल्याने कोरोनाचा प्रसार रोखणे पालिकेसाठी मोठे आव्हान होते. मात्र जास्तीतजास्त लोकांची तपासणी, तत्काळ निदान आणि योग्य उपचाराद्वारे धारावीने कोरोनाला मात दिली. गेल्या महिन्याभरात धारावीतील रुग्णांची संख्या दररोज सरासरी २०पेक्षा कमी आहे.
कडाऊन टप्प्याटप्प्याने खुले होत असताना दादर आणि माहिम परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दादरमध्ये रुग्णांची संख्या ४२० एवढी होती. त्यामध्ये वाढ होत आता १,१०२ रुग्णांची नोंद झाली आहे, तर माहिममध्ये ६५१ रुग्णसंख्या १,३९९ वर पोहोचली आहे. दादर, माहिम परिसर हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने लॉकडाऊन खुले झाल्यानंतर येथील दुकाने, मंडया सुरू झाल्या आहेत. त्यामुळेच रुग्णसंख्या वाढल्याचा दावा अधिकारी करीत आहेत.
अंधेरी, मालाडमध्ये सर्वाधिक रुग्ण
मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८८ हजार ७९५ एवढी आहे. यापैकी आता २२ हजार रुग्ण सक्रिय आहेत. तर सर्वाधिक ५,९८० रुग्णसंख्या विले पार्ले पूर्व, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी पूर्व या के पूर्व विभागातील आहे. त्यापाठोपाठ पी उत्तर विभागात मालाड, मालवणीत एकूण ५,४९० रुग्णांची नोंद झाली आहे.
आणखी ७२२ इमारती प्रतिबंधित
झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर आता इमारतींमध्ये काही ठिकाणी वाढ दिसून येत आहे. त्यामुळे गेल्या ११ दिवसांमध्ये प्रतिबंधित केलेल्या इमारतींच्या संख्येत ७२२ इतकी वाढ झाली आहे. यामध्ये बोरीवली, कांदिवली, अंधेरी, वडाळा आणि मुलुंड येथील इमारतींचा सर्वाधिक समावेश आहे.