नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून त्यामुळे जिल्ह्याच्या अनेक भागांचं नुकसान झालं आहे. नाशिक शहरात काल २४ तासात ६७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गोदावरी नदीचं पाणी वाढल्यानं रामकुंड परिसरात अडकलेल्या चार जणांना महापालिकेच्या जीवरक्षक पथकानं बचावलं. सिन्नर तालुक्यात काल रात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळं सरस्वती नदीला पूर आला असून नदीचं पाणी सिन्नर बाजारपेठेत शिरलं. पोलीस तसंच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेनं मध्यरात्री उशिरा पुराच्या पाण्यात आणि दुकानात अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढलं. पुराच्या पाण्यात काही गाड्याही वाहून गेल्या आहेत तसंच आजूबाजूच्या शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. इगतपुरी तालुक्यात पाझर तलाव फुटला आहे. तर मालेगाव तालुक्यातील सोयगाव भागांत घरांमध्ये पाणी शिरले.
अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर आणि अकोले तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. श्रीरामपूर तालुक्यातल्या टाकळीभान आणि नेवासा बुद्रुक या दोन भागात प्रत्येकी १५८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अकोले इथं १६६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर देवठाण - आढळा धरण परिसरात १७० आणि निळवंडे धरणावर १५३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. संगमनेर तालुक्यात जोरदार पावसामुळं म्हाळुंगे आणि आढळा या दोन नद्यांना पूर आला असून काही ठिकाणी रहिवासी भागात पुराचं पाणी शिरल आहे. पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा मुळा धरणातून २ हजार १७० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे मुळा धरणातील जलसाठयात २५ हजार ७०० दशलक्ष घनफूट एवढी वाढ झाली आहे. (AIR NEWS)