नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन, मोदींनी देशहितासाठी आणि नागरिकांसाठी हे मोठे पाऊल उचलले आहे. देशातील आरोग्य यंत्रणा आणि पोलीस प्रशासन जोमाने कामाला लागल्याचे पाहायला मिळत आहे. रस्त्यावर पोलीस आहेत, तर रुग्णालयात डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी दिसतात. सर्वच राज्यांचे आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री सातत्याने बैठका घेत आहेत. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हेही परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन आहेत. जागतिक पातळीवर पर्यावरणाशी संबंधित संस्थेत काम करणारे, युरोपातील नॉर्वे या देशाचे राजकीय नेते ईरिक सोल्हेम यांनी भारताने हाताळलेल्या परिस्थितीचे कौतुक केले आहे.
जगातील लोकसंख्येच्या तुलनेत भारताची लोकसंख्या १/५ एवढी आहे, तरीही भारताने २१ दिवसांचा लॉक डाऊन करत कोरोनाविरुद्धच्या लढाईत महत्वाचे पाऊल उचलल आहे. जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. तो भारतातही आता वेगाने आपले हात-पाय पसरू लागला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा सामना करण्यासाठी मोदींनी देशभरात २१ दिवस संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. भारतात सध्या कोरोनाबाधितांची संख्या ८७९ वर गेली आहे. आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील इतर प्रगत देशांच्या तुलनेत ही संख्या खूप कमी आहे. त्यामुळेच, भारताने कोरोनासंबंधी घेतलेल्या निर्णयाचे परदेशातूनही कौतुक होत आहे.
(PRAHAAR)