कॅनडामध्ये काही गटांनी भारताच्या माजी प्रधानमंत्री दिवंगत इंदिरा गांधी यांच्या हत्येची घटना साजरी केल्याबद्दल, परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी कॅनडाला फटकारलं आहे. फुटीरतावादी, अतिरेकी तसंच कॅनडामध्ये होत असलेल्या हिंसाचाराचं समर्थन करणाऱ्यांना दिली जाणारी मोकळीक, कॅनडाच्या भारतासोबतच्या संबंधांसाठी तसंच त्यांच्या स्वतःच्या हितासाठी चांगली नाही, असा सल्लाही जयशंकर यांनी दिला आहे. ते आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते. केवळ मतांच्या राजकारणासाठीच हे घडू दिलं जात असल्याचं भारताला वाटतं असंही जयशंकर यावेळी म्हणाले.
कॅनडात शिकत असलेल्या ७०० भारतीय विद्यार्थ्यांना माघारी पाठवण्याचा तिथल्या अधिकाऱ्यांचा विचार आहे, मात्र चांगल्या शिक्षणाच्या हेतूनं आलेल्या विद्यार्थ्यांना अशी शिक्षा देणं योग्य वाटत नाही, असं मत जयशंकर यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केलं. या विद्यार्थ्यांची काही चूक नसेल तर यावर तोडगा काढण्यासाठी भारत कॅनडा सरकारवर दबाव आणायचा प्रयत्न करेल असं जयशंकर म्हणाले. (AIR NEWS)