प्रसिद्ध उद्योजक सायरस मिस्त्री यांचं आज पालघर जिल्ह्यात मुंबई अहमदाबाद द्रुतगती महामार्गावर चारोटी इथं रस्ते अपघातात निधन झालं. ते ५४ वर्षांचे होते. अहमदाबाद इथून मुंबईला येत असताना सूर्या नदीवरच्या पुलावर दुभाजकाला त्यांची गाडी धडकून हा अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्यामुळे मिस्त्री यांच्या गाडीचा अपघात झाल्याचं प्रथमदर्शनी आढळून येत असल्याचं पालघरच्या पोलीसांनी सांगितलं आहे. मिस्त्री यांच्या बरोबर प्रवास करणाऱ्या तीन जणांपैकी एकाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
भारतीय वंशाचे सायरस मिस्त्री आयर्लंडचे नागरिक होते. देशातला अग्रगण्य उद्योग समूह टाटा ग्रूपचे ते काही काळ अध्यक्ष होते. मिस्त्री यांचा जन्म तसंच शालेय शिक्षण मुंबईत झालं होतं. त्यानंतर इंग्लंडहून त्यांनी अभियांत्रिकी आणि व्यवसाय व्यवस्थापनाचं शिक्षण घेतलं आहे. बांधकाम क्षेत्रातल्या शापूरजी पालनजी उद्योगाचे ते व्यवस्थापकीय संचालक होते. सायरस मिस्त्री यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरांमधून दुःख व्यक्त होत आहे.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सायरस मिस्त्री यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या जाण्यानं भारतातल्या व्यापारी समुदायाचं मोठं नुकसान झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
सायरस मिस्त्री यांचं अकाली निधन धक्कादायक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारताच्या आर्थिक सक्षमतेवर विश्वास असलेले ते एक आश्वासक व्यावसायिक होते, त्यांच्या जाण्यानं वाणिज्य आणि उद्योग क्षेत्राचं मोठं नुकसान झाल्याचं त्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे.
सायरस मिस्त्री यांच्या निधनाचं वृत्त धक्कादायक असल्याचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. देशातल्या एका मोठ्या उद्यमशील घराण्यात जन्माला येऊन स्वतःच्या कर्तृत्वानं त्यांनी भारतीय उद्योग विश्वात आपला ठसा उमटवल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सायरस मिस्त्री यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ते केवळ एक यशस्वी उद्योजकच नव्हे, तर तरुण आणि ज्यांच्याकडे कोणीही आशेने पाहावं असे ते होते, असं त्यांनी म्हटलं आहे.
सायरस मिस्त्री यांच्या जाण्यानं उद्योग जगताची मोठी हानी झाली आहे. भारताची आर्थिक शक्ती ओळखणारं, ते एक उमदं व्यक्तिमत्व होतं, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राज्याच्या पोलीस महासंचालकांना या अपघाताची सखोल चौकशी करण्याच्या सूचना दिल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सायरस मिस्त्री यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. भारताच्या आर्थिक विकासात योगदान देण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न राहिला असं त्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे. मिस्त्री यांच्या निधनानं आपण एक सज्जन आणि कर्तृत्ववान मित्र गमावल्याचं भारतीय आरपीजी संघाचे अध्यक्ष हर्ष वर्धन गोएंका यांनी म्हटलं आहे. जागतिक बांधकाम क्षेत्रातल्या शापूरजी पालनजी या कंपनीच्या उभारणीत सायरस मिस्त्री यांचा मोलाचा वाटा होता तसंच त्यांनी टाटा समूहाचं नेतृत्व सक्षमपणे केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. (AIR NEWS)