पश्चिम बंगालला काल मध्यरात्री धडकलेलं बुलबुल हे चक्रीवादळ आज पहाटेच्या वेळेत बांगलादेशाकडे सरकलं आहे. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे झालेल्या वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये पश्चिम बंगालमध्ये ३ तर ओदिशात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. आकाशवाणीकडे आलेल्या प्राथमिक माहितीनुसार चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमधल्या मिदनापूर आणि २४ परगणा, हावडा, हुगळी आणि कोलकत्त्यात अनेक घरांचं नुकसान झालं तर कित्येक झाडंही उन्मळून पडली आहेत. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणं पाण्याखाली गेली आहेत.
ओदिशातल्या जयपूर, जगतसिंगपूर, केंद्रपाडा, भद्रक आणि बालसोर या जिल्ह्यांनाही वादळाचा फटका बसला. उन्मळून पडलेली झाडं बाजुला केल्यानंतर अनेक ठिकाणचा वीजपुरवठा आणि दूरध्वनी सेवा पूर्ववत सुरु झाली आहे. केंद्रपाडा, भद्रक आणि बालसोर जिल्ह्यात परिस्थिती पुर्वपदावर आणण्यासाठी अजूनही काही कालावधी लागू शकतो अशी माहिती विशेष मदत आणि पुनर्वसन आयुक्त प्रदीप जेना यांनी दिली आहे. चक्रीवादळामुळे झालेल्या पीक नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पथकं पाठवावीत अशी विनंती केंद्र सरकारला केली असल्याची माहिती ओदिशाचे मुख्य सचिव असित त्रिपाठी यांनी दिली आहे. (AIR NEWS)