भिवंडी (प्रतिनिधी) : शहरातील धामणकरनाका परिसरातील इमारत दुर्घटनेतील मृतांच्या आकड्यांत तफावत आढळली आहे. पालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत ४१ रहिवाशांचा बळी गेला असून, पोलिसांनी मात्र आतापर्यंत ३८ मृतदेहांचाच पंचनामा केल्याचे सांगितले आहे.
पटेल कम्पाउंड येथील तीन मजली जिलानी इमारत सोमवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास कोसळली होती. या दुर्घटनेतील काही मृतांची नावे, आडनावे आणि मृतांच्या आकडेवारीतही तफावत दिसून आली. बुधवारी सायंकाळी ४१ मृतांची माहिती बचावकार्यासह मनपा प्रशासनाकडून देण्यात आली होती.
मात्र, पोलीस प्रशासनाने मृतदेहांचा पंचनामा व इतर बाबी तपासल्यानंतर आतापर्यंत ३८ जणांचा मृत्यू, तर २५ जण जखमी झाल्याची माहिती दिली आहे. पोलिसांनी केलेल्या दाव्याला सरळसरळ पंचनाम्याचा आधार आहे. मात्र, बचाव पथकाने पत्रकारांशी बोलताना ४१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली होती.
(PRAHAAR)