मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत मंगळवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी भरले आहे. मध्य रेल्वे मार्गावरील सायन स्टेशन येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून रेल्वेरूळ पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. सायनजवळ लोकल खोळंबल्याने अनेक प्रवाशांची कोंडी झाली आहे. सध्या केवळ अत्यावश्यक सेवांमधील कर्मचा-यांसाठी विशेष लोकल चालवल्या जात आहेत. त्यामुळे प्रवाशांची संख्या कमी असली तरी उपनगरांच्या दिशेने जाणारे प्रवासी सायन स्टेशनमध्ये अडकून पडले आहेत. मुंबई शहर व उपनगरांत मंगळवारी दिवसभर हलका पाऊस होता.
सायंकाळनंतर पावसाचा जोर वाढला. सुमारे तीन तास सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक सखल भागांत पाणी भरले आहे. गोरेगावमध्ये अनेक रस्ते जलमय झाले आहेत. रस्त्यांवर पाण्याचे मोठे लोट पाहायला मिळत आहेत. मालाड, अंधेरी, खार, दादर या भागांतही पाणी भरले असून बेस्टने अनेक मार्गांवरील वाहतूक अन्य मार्गांवर वळवली आहे. मुंबई पालिकेने याबाबत ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे. (PRAHAAR)