मुंबई (प्रतिनिधी) : अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या निसर्ग चक्रीवादळ गोवा, मुंबई आणि सुरतच्या नजीक असल्याचं भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. काही तासात हे वादळ रौद्ररुप धारण करणार असल्यामुळे प्रशासनाने हायअलर्ट जारी केला आहे.
चक्रीवादळाच्या वादळाची सद्यस्थिती पाहता आयएमडीने म्हटलं आहे की, पूर्व-मध्य अरबी समुद्रामध्ये तयार झालेला दाबाचा पट्टा मुंबईच्या ५५० किमी, पणजीच्या ३०० किमी, सुरतच्या ७७० किमी दूर आहे. हवामान खात्याने चक्रीवादळाच्या परिस्थितीचा आढावा घेत रात्री अडीच वाजता ही माहिती दिली. मंगळवारी हवेच्या दाबाचा पट्टा आणखी वाढणार असल्याने जवळपास १२ तासाच्या आत समुद्रात तीव्र स्वरुपाचं चक्रीवादळ येणार आहे. चक्रीवादळाचा तडाखा महाराष्ट्रातील हरिहरेश्वर, गुजरातमधील दमन यादरम्यान ३ जूनपर्यंत येण्याची शक्यता वर्तवली आहे.
अरबी समुद्रात येणाºया निसर्ग चक्रीवादळामुळे राज्य सरकारसह एनडीएमए, एनडीआरएफ, आयएमडी, भारतीय तटरक्षक दल तैनात करण्यात आलं आहे. या वादळामुळे महाराष्ट्र, गुजरात, दीव-दमन याठिकाणी काही भागांवर मोठा परिणाम होणार आहे. एनडीआरएफने गुजरातमध्ये २ राखीव दलासह १३ टीम आणि महाराष्ट्रात ७ राखीव दलासह १६ टीम तैनात करण्यात आली आहेत. तर दीव-दमन, दादरा-नगरहवेली येथे एक-एक टीम तैनात केली आहे.
(PRAHAAR)