राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर आजही कायम असून उद्याही हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दमदार पावसामुळे राज्यभरातल्या धरणांच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस सुरु असून मंत्रालय नियंत्रण कक्ष राज्यातल्या सर्व जिल्हा नियंत्रण कक्षांच्या सातत्यानं संपर्कात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनानं पूर प्रवण जिल्ह्यांमध्ये NDRF आणि SDRF च्या तुकड्या तैनात केल्या आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात गेले तीन दिवस मुसळधार पाऊस पडत असून जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी येत्या १६ जुलैपर्यंत शाळा, महाविद्यालयं आणि खासगी आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. जिल्ह्यात संततधार पाऊस पडत असल्याने १५ हून अधिक प्रमुख मार्ग बंद असून, शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे. आतापर्यंत पूरबाधित १८ गावांतल्या १७७ कुटुंबाना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे. भामरागड जवळच्या पर्लकोटा नदीला पूर आल्यामुळे भामरागड-आलापल्ली मार्ग बंद असून, त्या परिसरातल्या सुमारे शंभर गावांचा संपर्क तुटला आहे. सिरोंचा तालुक्यातल्या काही गावांमधले रपटे वाहून गेल्यानं १५ गावांचं दळणवळण ठप्प झालं आहे. जिल्ह्यातल्या प्राणहिता, गोदावरी आणि इंद्रावती या नद्यांच्या पाण्याची पातळी वाढत असल्यानं नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. आज दिवसभर जिल्ह्याच्या सर्व भागात मुसळधार पाऊस पडला. यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेनं अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता महानगरपालिका क्षेत्रातल्या सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर केली आहे. तसंच पावसाची स्थिती यापुढेही कायम राहिली तर सुट्टी देण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापनाला दिल्याची माहिती शिक्षण उपायुक्त जयदीप पवार यांनी दिली. सातारा जिल्ह्यात पडत असलेल्या संततधार पावसामुळे कोयना धरणाच्या पायथा वीज गृहातून नदीपात्रात आज संध्याकाळी १ हजार ५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु झाला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सांगली शहराजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी १८ फुटावर आज स्थिर आहे. मात्र कोयना धरण पायथा विद्युत गृहातून होत असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार कायम असून नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत आहे. आज सकाळपासून पावसाचा जोर कमी असला अधून मधून मोठ्या सरी बरसत आहेत. पंचगंगेची पाणी पातळी धोक्याच्या पातळी खाली केवळ ३ फुटावर आहे. धरणक्षेत्रात सुरु असलेल्या दमदार पावसामुळे पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होत आहे. जिल्ह्यातले ५६ बंधारे पाण्याखाली गेल्यानं आज वाहतूक काही अंशी विस्कळीत झाली आहे. गगनबावडा, शाहूवाडी आणि राधानगरी तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली.
भंडारा जिल्ह्यात कालपासून अतिवृष्टीची नोंद झाली असून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व उपविभागीय अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांची तातडीनं आढावा बैठक घेतली. जिल्ह्यातल्या नदीकाठच्या आणि पूरप्रवण १३० गावांमधल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा द्यावा तसंच तहसीलदारांनी पुराबाबतची माहिती वेळोवेळी गावकऱ्यांपर्यंत पोहोचवावी. आवश्यक कामाशिवाय नागरिकांनी प्रवास टाळावा असे आदेश जिल्हा प्रशासनानं दिले आहेत. जिल्ह्यातल्या गोसीखुर्द धरणाचे ३३ दरवाजे उघडण्यात आले असून त्यामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
ठाणे जिल्ह्यात बदलापूर, अंबरनाथ परिसरात दमदार पाऊस पडत असून उल्हास नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. उल्हास नदीवर बदलापूर बॅरेज, जांभूळ बंधारा आणि मोहने बंधारा इथं नदीच्या पाणी पातळीनं धोक्याची पातळी ओलांडली असून जिल्हा प्रशासनानं नदी काठावरच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. यवतमाळ जिल्ह्यात महागाव आणि उमरखेड तालुक्याला अती पावसाचा तडाखा बसला असून शेकडो हेक्टर शेती क्षेत्रात पावसाचं पाणी शिरलं आहे. संततधार पावसामुळे नदी- नाल्यांना पूर आला आहे. पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत असून, महागाव तालुक्यातल्या शिरपूल्ली गावात नदीचं पाणी शिरलं आहे. उमरखेड तालुक्याला जोडणारे अनेक मार्ग पुलावरून पाणी वाहत असल्यानं बंद पडले आहेत. अनेक गावांना पुराचा वेढा पडला आहे.
नांदेड जिल्ह्यात गेले तीन दिवस पडत असलेल्या पावसामुळे ३४ प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरले आहेत. सर्व संबंधितांना पूर परिस्थितीबाबत दक्ष राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत. मुदखेड तालुक्यात सीता नदीला पूर आला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. किनवट परिसरात पैनगंगा नदीच्या पुराचं पाणी सखल भागात शिरलं आहे. या भागातल्या २०० कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. नांदेड-किनवट मार्ग पुराच्या पाण्यामुळे बंद झाला आहे.
पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून अकलोली- केलठण मार्गावरचा पूल पाण्याखाली गेला आहे. गौरपूर वनगा पाडा इथल्या ३ घरांत पाणी गेल्यानं त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. जिल्ह्यातल्या धामणी धरण क्षेत्राच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे पुढील २४ तासांत धामणी धरणाचे १, ३ आणि ५ क्रमांकाचे दरवाजे उघडण्यात येणार असून सूर्या नदीत पाण्याचा विसर्ग केला जाईल.
वसई तालुक्यात वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाघराळपाडा इथं एका घरावर डोंगराचा काही भाग कोसळल्यानं एकाच कुटुंबातल्या दोन जणांचा मृत्यू झाला, तर दोन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. जिल्ह्यातल्या शाळांना प्रशासनानं उद्या सुट्टी जाहीर केली आहे.
जळगाव जिल्ह्यात तापी नदीवरच्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यानं हतनूर धरणाच्या ४१ दरवाज्यांपैकी २२ दरवाजे उघडण्यात आले आहेत. तापी नदीपात्रात २२ हजार ४९६ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे.हतनूर धरण परिसरातल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्यात दांडेगाव इथल्या पाझर तलावाचं पाणी सांडव्यावरून ओसंडून वाहत असून तलावा खालचे तुडुंब भरून वाहत आहेत. नाल्याचं पाणी शिरल्यामुळे दांडेगाव, सालापूर, रेडगाव, वडगाव परिसरातल्या शेतीचं नुकसान झालं आहे.
मुंबईत आज पहाटेपासून जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. मात्र दुपारपासून पावसाचा जोर ओसरला. पावसामुळे मुंबईच्या सखल भागात पाणी साचलं आणि वाहतुकीची कोंडी झाली. रेल्वे वाहतूकही १५ ते २० मिनिटं विलंबानं सुरु होती. सकाळी पावणे बारा वाजता समुद्रात ४.६८ मीटर उंचीच्या लाटा उसळल्या. या दरम्यान पाऊस काहीसा थांबून पडल्यानं पूरस्थितीचा धोका टळला. हवामान विभागानं पुढील दोन दिवस मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. (AIR NEWS)