राज्यातल्या सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा युक्तिवाद न्यायालय ऐकून घेणार आहे. राज्यातल्या सत्ता संघर्षावर कालपासून नियमित सुनावणी सुरु झाली, काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनु संघवी यांनी युक्तिवाद केला. विधानसभा अध्यक्षांचे अधिकार, नबाम राबिया प्रकरण, आमदारांची अपात्रता या मुद्यांवर हा युक्तिवाद केंद्रीत होता. नियमानुसार पदमुक्तीची नोटीस दिल्यानंतर अध्यक्ष निर्णय घेऊ शकत नाही, मात्र ज्यावेळी आमदारांना अपात्रतेसंदर्भात नोटीस देण्यात आली, त्यावेळी विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव नव्हता, असं त्यांनी सांगितलं.
अधिवेशन सुरू असतानाच अध्यक्षांना हटवण्याची नोटीस दिली जाते, अशाने कुणीही सरकार पाडू शकेल, असं सिब्बल म्हणाले. मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय अधिवेशन बोलावण्याचा राज्यपालांना अधिकार नाही, असंही त्यांनी सांगितलं. ठाकरे गटाच्या तब्बल चार तासांच्या युक्तिवादानंतर शिंदे गटाकडून हरीश साळवे यांनी युक्तीवाद केला. यावेळी त्यांनी नबाम रेबिया निकालाचा दाखला दिला. मात्र त्याचा या निर्णयावर परिणाम होणार नसल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं. आज पुन्हा साळवे यांचा युक्तिवाद होणार आहे. (AIR NEWS)