राज्याच्या ३१ जिल्ह्यांमधल्या २ हजार २१७ गावांमध्ये आतापर्यंत लम्पी त्वचा रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. या रोगानं बाधित ५८ हजार १३१ पशुधनापैकी २९ हजार ४१० जनावरं उपचारानंतर बरी झाली, तर उर्वरित पशुधनावर उपचार सुरु असल्याचं पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी काल सांगितलं.
राज्यात अकोला, जळगांव, कोल्हापूर, सांगली, वाशिम आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमध्ये पशुधनाचं लसीकरण पूर्ण झालं आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेल्या लसीकरणाच्या आकडेवारीनुसार राज्यात जवळजवळ ७९ पूर्णांक ३७ शतांश टक्के गोवंशीय पशुधनाचं लसीकरण झाल्याचं ते म्हणाले.
पशुपालकांनी घाबरून जाऊ नाही, तसंच रोगाची लक्षणं दिसल्यावर वेळेवर उपचार सुरु झाले तर पशुधन दगावण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे पशुपालकांनी आपल्या पशुधनामध्ये लम्पी या रोगाची लक्षणं आढळली तर जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी त्वरित संपर्क साधावा असं आवाहन पशुसंवर्धन आयुक्तांनी केलं आहे. (AIR NEWS)