नागपूर (प्रतिनिधी) : ऑगस्टच्या अखेरच्या आठवड्यात आलेल्या पुरामुळे नुकसान झालेल्या नागपूर विभागातील जिल्ह्यांसाठी आणखी १७० कोटी रुपयांची गरज असल्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाकडून राज्य शासनाला पाठविण्यात आला आहे.
विदर्भात ३०, ३१ आणि १ सप्टेंबर रोजी आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कन्हान, पेंच, बावनथडी, वैनगंगा व इतर उपनद्यांना पूर आल्याने पूर्व विदर्भात पुराचे संकट निर्माण झाले. यात शेतीचे नुकसान झाले असून हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. कुणाची घरे पडली, तर गुर ढोर वाहून गेली. हे नुकसान भरून काढण्यासाठी प्रशासनाकडूनही पंचनामे करण्यात आले. ६ सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मदत जाहीर करण्यात आली.
पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्यांना सानुग्रह मदत, निराधार झालेल्या कुटुंबांना मोफत अन्न धान्य वितरित करणे, घर पडझडीच्या नुकसानीसाठी मदत यासह शेतपिकांच्या नुकसानीची भरपाई म्हणून मदत जाहीर करण्यात आली. सुमारे ७१ कोटींची ही मदत अपुरी असून आता पुन्हा १७० कोटी मिळावे यासाठीची प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले.