मुंबई (प्रतिनिधी) : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळण आले आहे. सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांनी मंगळवारी केला. कोणालातरी वाचवण्याचे प्रयत्न राज्य सरकार करत आहे. अद्यापही हत्येची एफआयआर दाखल झाली नाही असेही त्यांनी सांगितले.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येच्या चौकशीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावरुन नारायण राणे यांनी भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे सरकारवर टीका केली.
सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या आत्महत्याची पोलिसांनी चौकशी का केली नाही. माझ्या माहितीनुसार तिने आत्महत्या केली नाही, तर तिची देखील हत्या केली आहे. तिच्यावर बलात्कार करुन तिला मारण्यात आले आहे. तिच्या गुप्तांगावर जखमा आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्या दृष्टीने तपास करायला हवा, असे नारायण राणे म्हणाले. सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलीस कोणाला वाचवत आहे, असा प्रश्नही नारायण राणे यांनी यावेळी उपस्थित केला.
दिनो मोरिया आहे तरी कोण?
नारायण राणे म्हणाले की, सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सरकार कोणाला तरी वाचवण्यासाठी चौकशीत टाळाटाळ करत आहे. मुंबई पोलिसांना सुशांतसोबत १३ तारखेच्या आणि ८ तारखेच्या पार्टीत कोण होते हे माहिती नाही का?
सगळ्या गोष्टी लपवल्या जात आहेत, गुन्हेगारांना वाचवण्यासाठी सरकार काम करत आहे. सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्तीला शोधून चौकशी करावी, दिनो मोरियाच्या घरी पार्टीला राज्य सरकारमधील मंत्री काय करतात? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
सुशांतच्या घराजवळ एक बंगला आहे. तिथे रोज काही मंत्री येतात. ते तिथे तीन तास काय करतात? १३तारखेला ते तिथे जमले आणि तिथून सुशांतच्या घरी गेले. तिथे मंत्री गेले असतील तर कॅमे-यात त्यांचा ताफा वगैरे ते येणार नाहीत.
सगळ्यांना माहिती आहे कोण आहे ते, ज्याअर्थी जेवढा दबाव सरकार आणि पोलिसांवर येतोय, अधिकारी वाचवायचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांना मी सांगू इच्छितो, हे होऊ शकणार नाही. विरोधी पक्ष सक्षम आहे. तो अशा गोष्टी होऊ देणार नाही, असा इशाराही नारायण राणे यांनी दिला.
सरकार हा विषय दुर्लक्षित कसा करता येईल याचा प्रयत्न करत आहे. सुशांतची आत्महत्या नाही, तर हत्या करण्यात आली आहे. अनेक तज्ज्ञ तेच सांगत आहेत. याप्रकरणी राज्य सरकारची चौकशी ज्या दिशेला चालली आहे, त्यामधून या सरकारला कुणाला तरी वाचवायचे आहे हे दिसत आहे. सुशांतच्या केसमध्ये जे लोक वाचवायचा प्रयत्न करत आहेत त्यांनी गप्प बसावे. नाहीतर त्यांच्याही कुंडल्या बाहेर काढल्या जातील, असा इशारा नारायण राणे यांनी दिला.
बिहारमध्ये याबाबत एफआयआर दाखल झाला. पण महाराष्ट्रात झाला नाही. ५० दिवस झाले, आरोपी कोण आहे? हे समोर आलेले नाही. जगात मुंबई पोलिसांची ख्याती आहे, नावलौकिक आहे. पण ५० दिवसात सुशांतसोबत त्यादिवशी रात्री पार्टीला जे उपस्थित होते, त्यांना अटक का करत नाही? त्याला रुग्णालयात नेणारा माणूस दोन तासांनी येतो आणि सांगतो की, मी लटकताना पाहिले. तो ठराविक रुग्णवाहिकाच का बोलवतो? ठराविक रुग्णालयात का नेतो? सर्व संशयास्पद घटना आहेत, असेही राणेंनी यावेळी सांगितले.
काम न करणे हेच धोरण या सरकारचे आहे. आज कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. मुंबईत ६ हजारापेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तरी सरकारला काही वाटत नाही. साडेसहा हजार लोकांचा मृत्यू? हा छोटा आकडा आहे का, सरकार यावर का बोलत नाही? निरपराध लोकांचा खून करण्याचे या सरकारला लायसन्स दिलेले नाही, अशी टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केली.
मंत्रालय बंद करा
सरकार अस्तित्वात आहे असे वाटतही नाही. मुंबईत पाऊस फक्त आज पाऊस पडतोय असे नाही. दरवर्षी मुंबईत पाऊस पडतो. दरवर्षी पावसात एक-दोन वेळा मुंबई बंद पडते. पण सकाळीच पाऊस पडला म्हणून मंत्रालयाला सुट्टी? मला मुख्यमंत्र्यांना सांगायचे आहे, कायमचे मंत्रालय बंद करा ना नाहीतरी कुणी येतच नाही. फक्त अधिका-यांना बसण्यासाठी मंत्रालय का चालू ठेवायचे? का एवढा खर्च करायचा? एकतर वेळेवर पगार देत नाहीत. कर्मचा-यांना कधी ७५ टक्के, ५० टक्के पैसे, तर कधी पैसे मिळत नाही. कर्मचा-यांची आज अशी परिस्थिती आहे.
सामनातून पत्रकार परिषदा घेता. त्यापेक्षा कोरोनाच्या मृतांची संख्या कमी करुन दाखवा. बाधित लोकांना ठणठणीत करुन दाखवा, असे आव्हान राणे यांनी सरकारला दिले.
युवा नेत्याच्या चमच्याला इशारा
युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांवर टीका केली. याबाबत राणे यांनी इशारा देताना सांगितले की, त्यांनी ज्या शब्दात टीका केली त्यावर मी त्यांना एवढेच सांगेन की, तू लहान आहेस. तोंड बंद करण्याचा उपाय आमच्याकडे आहे. त्यामुळे तोंड सांभाळून बोल. शिवसेनेत आता नवे कलेक्टर आले आहेत. त्यांच्या कुंडल्या आम्हाला माहिती आहेत. ते कुठे जातात, काय करतात, कुणाशी बोलतात, कुणाशी तडजोड करतात, ते सर्व आम्हाला माहिती आहे. त्यामुळे त्यांनी तोंड बंद करावे. वरुण सरदेसाई यांनी अमृता फडणवीसांवर ज्या शब्दात टीका केली, त्याबद्दल त्यांनी माफी मागावी, अशी मागणी नारायण राणे यांनी केली.
गणेशभक्तांवर निर्बंध नकोत
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. लोकांच्या व्यथा जाणून घेत आहेत. मात्र, उद्धव ठाकरे यांनी घराबाहेर न पडता प्रशासन चालवायची प्रतिज्ञा केली आहे, अशी टीका राणे यांनी केली. याशिवाय, कोकणात जाणा-या चाकरमान्यांवर लादण्यात आलेल्या निर्बंधांवरूनही राणेंनी सरकारला लक्ष्य केले.
निसर्ग चक्रीवादळानंतर राज्य सरकारने कोकणाला एका रुपयाची मदत केली नाही. यानंतर आता कोकणचे आराध्यदैवत असलेल्या गणपतीसाठीही लोकांना जाऊन दिले जात नाही. सरकारने लादलेल्या अटी योग्य नाहीत. राज्य सरकारने कोकणात येणा-या लोकांसाठी केवळ एक दिवसाचा क्वारंटाईन कालावधी ठेवावा. तसेच खासगी वाहनांनी जाणा-यांना ई-पासची सक्ती करु नये, अशी मागणीही नारायण राणे यांनी केली.