सिडनी : भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरसाठी रविवारी असलेला तिचा वाढदिवस अधिक संस्मरणीय करण्याची संधी आहे. याच दिवशी टी-ट्वेन्टी विश्वचषक स्पर्धेत भारताचा संघ ऑस्ट्रेलियाशी अंतिम फेरीत दोन हात करेल. फायनलच्या दिवशी हरमनचा ३१वा वाढदिवस आहे. जेतेपद पटकावून तिला वाढदिवसाचे अनोखे ‘गिफ्ट’ देण्यासाठी भारताचा संघ उत्सुक आहे. हरमनप्रीतलाही तसेच वाटत आहे. विश्वचषक टी-ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताला पोहोचवणारी हरमनप्रीत भारताची पहिली कर्णधार आहे.
‘क्रिकेट चाहत्यांनी मोठी गर्दी करावी’
अंतिम फेरीत आम्हाला पाठिंबा दर्शवण्यासाठी चाहत्यांनी मोठय़ा प्रमाणावर मेलबर्न स्टेडियममध्ये गर्दी करावी, अशी विनंती हरमनप्रीतने केली आहे. ‘प्रत्येक क्रिकेटपटूने केलेली मेहनत आणि चाहत्यांच्या पाठिंब्यामुळेच आम्ही अंतिम फेरी गाठू शकलो. परंतु, अंतिम लढतीतही आम्हाला तुमच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. तुमची साथ आम्हाला विश्वचषकासह मायदेशी परतण्यासाठी प्रेरणादायी ठरेल,’ असे हरमनप्रीत म्हणाली.
आई-वडिलांची उपस्थिती असावी; हरमनची इच्छा
माझे आई-वडील एखाद्या आंतरराष्ट्रीय सामन्यात माझा खेळ पाहण्यासाठी उपस्थित होते. मात्र उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. ‘मला खेळताना पाहण्याची त्यांची इच्छा अपूर्ण राहिली. परंतु अंतिम सामन्यासाठी त्यांची उपस्थिती असावी, असे मला वाटते. तशी मी त्यांना विनंती करेन, असे ३० वर्षीय हरमनप्रीत म्हणाली.
दडपण घेऊ नका: सचिन तेंडुलकर
मुंबई : विक्रमवीर सचिन तेंडुलकरने भारताच्या क्रिकेटपटूंना मोलाचा संदेश दिला आहे. ‘मैदानात जा आणि सर्वोत्तम कामगिरी करा आणि माझा महिला संघातील खेळाडूंना महत्त्वाचा संदेश म्हणजे अंतिम फेरीचे दडपण घेऊ नका. असा संदेश देणे सोपे असले तरी शांत राहा आणि दमदार कामगिरी करा. संघ म्हणून एकत्र येऊन खेळा. संघातील प्रत्येक सहका-याकडून सकारात्मक गोष्टी घ्या. मी महिला संघाचे सामने सतत पाहत आहे. काही क्रिकेटपटू अनेक तरुण-तरुणींचे प्रेरणास्रेत आहेत. त्यामुळे मैदानात जाऊन जोरदार कामगिरी करा,’ असे तेंडुलकरने म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियाची मीगॅन शूट घाबरली; स्मृती, शेफालीला गोलंदाजी करणार नाही!
मेलबर्न : ऑस्ट्रेलियाची प्रमुख गोलंदाज मीगॅन शूटने अंतिम लढतीआधी सपशेल शरणागती पत्करली आहे. फॉर्मात असलेली भारताची सलामीवीर शेफाली वर्मा आणि तिची सहकारी स्मृती मन्धानाला ‘पॉवर प्ले’मध्ये गोलंदाजीच करणार नसल्याचे तिने म्हटले आहे.
उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १७ धावांत २ बळी घेत शूटने ऑस्ट्रेलियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, भारताच्या शेफालीने यावेळी कमालीचे सातत्य राखले आहे. शेफाली वर्मा आणि स्मृती मन्धाना या प्रारंभीच्या षटकांमध्ये करत असलेली फटकेबाजी पाहून शूटलाही घाम फुटला आहे. ‘स्मृती आणि शेफाली माझ्या गोलंदाजीवर चांगल्या खेळतात. तिरंगी मालिकेत शेफालीने माझ्या गोलंदाजीवर ठोकलेला षटकार अविस्मरणीय आहे. माझ्या गोलंदाजीवर कोणत्याही फलंदाजाने इतका उंच षटकार मारलेला नाही. या दोघींना रोखण्याची रणनीती आम्ही आखत आहोत. मात्र, सुरुवातीला या दोघांविरोधात गोलंदाजी करण्यासाठी मी योग्य नाही, निदान ‘पॉवर प्ले’मध्ये नाहीच नाही,’ असे शूट म्हणाली.
८ मार्च म्हणजेच जागतिक महिला दिनी यजमान ऑस्ट्रेलिया संघ मेलबर्न क्रिकेट मैदानावर महिला टी-ट्वेन्टी विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. त्यात हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारताचा सध्या चांगला खेळ करत आहेत. गतविजेता ऑस्ट्रेलियन संघ घरच्या मैदानावर खेळत असल्यामुळे त्यांचे पारडे जड आहे.
(PRAHAAR)