दक्षिण आफ्रिकेत झालेल्या १९ वर्षांखालच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचं विजेतेपद पटकावत बांगलादेशानं इतिहास घडवला. बांगलादेशानं काल झालेल्या अंतिम सामन्यात गतविजेत्या भारताला तीन गडी राखून पराभूत केलं, आणि पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकली. त्याआधी बांगलादेशानं नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं होतं.
मात्र भारताचा संघ ४७ षटकं आणि २ चेंडूत केवळ १७७ धावाच करू शकला. विजयासाठी १७८ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशाच्या सलामीवीरांनी दमदार सुरुवात केली.
मात्र त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी विशेषतः रवी बिष्णोईनं झटपट ४ गडी बाद करून भारताच्या विजयाची संधी निर्माण केली होती. त्यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे, डकवर्थ लुईस नियमानुसार बांगलादेशाला ४६ षटकांत १७० धावांचं सुधारित आव्हान देण्यात आलं होतं.
बांगलादेशाचा कर्णधार अकबर अलीनं संयमी नाबाद ४३ खेळी करत अधिक पडझड न होऊ देता ४२ षटकं आणि एका चेंडूमध्ये विजय लक्ष गाठत बांगलादेशाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. (AIR NEWS)